एका नाक्याची ऐतिहासिक समृद्धता!
मुंबई बंदर म्हणून उदयास यायच्या आधी मुंबईपासून जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर एक आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर अस्तित्त्वात होते हे किती जणांना माहित आहे? इसवीसन पूर्व कालखंडापासून सतराव्या शतकापर्यंत जगाच्या नकाशावर दिमाखात उभे असलेले पश्चिम किनारपट्टीवरील असे हे एकमेव ठिकाण होय. ज्याकाळी संजान-चिंचणी हे महामुंबईचे उत्तर टोक होते त्याकाळी दक्षिण टोकाचा मान या बंदराकडे होता. मुंबई बंदराच्या निर्मितीनंतर आजवर कधीही जितकी जहाजे या बंदराने पाहिली नसतील त्याच्या कितीतरी पटींनी अधिक जहाजांचे आदरातिथ्य या बंदराने केले आहे. एव्हाना काही लोकांनी जागेचा अंदाज बांधला असेल आणि तो अंदाज नक्कीच 'अलिबाग' हा असेल. पण हा अंदाज चुकीचा आहे. पर्यटक अलिबाग आणि मुरूड-जंजिराला आवर्जुन भेट देतात पण या प्रवासाच्या दरम्यान येणारा एक नाका कायम दुर्लक्षित राहतो. हा नाका म्हणजे 'चौल नाका'. पण चौल हे केवळ नाक्यापुरते मर्यादित नसून एकेकाळचे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर होते, याची अनेक जणांना माहिती नसते. म्हणूनच चौलला आवर्जुन भेट द्यायला हवी. दोन हजार वर्षापूर्वी भारतीय उप...