पाण्डय- पाण्डय हें फार प्राचीन राष्ट्र व राज्य होतें

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें    

पाण्डय- पाण्डय हें फार प्राचीन राष्ट्र व राज्य होतें. महाभारत (सभा, भीष्म व कर्णपर्व),  पुराणें व बृहत्संहिता यात या राष्ट्राचा उल्लेख येतो. वराहमिहिर तर पाण्डयराज, ताम्रपर्णीनदी व मोत्‍याचा समुद्र अशीं नावें उल्लेखितो. सांप्रतचे मद्रास इलाख्यांतील मदुरा व तिन्नेवेल्ली हे सबंध जिल्हे
आणि त्रिचनापल्ली जिल्हा व त्रावणकोरचें राज्य यांपैकी कांहीं भाग पूर्वीच्या या पाण्डयराज्यांत सामील होत असे. या भागावर जें राज्य असे त्यास पंचपाण्डय म्हणत, कारण हीं लहान लहान पांच राज्यें होतीं. परंतु या राज्याबद्दलचीं नाणीं, शिलालेख, वंशावळी व काव्यें यावरूनहि तपशीलवार
माहिती आढळत नाहीं प्लीनोच्या काळीं (१ ले शतक) या देशाची राजधानीं मदुरा उर्फ कुडाळ होती. त्या पूर्वी कोरकई आणि त्याच्याहि आधीं अत्यंत प्राचीन काळीं मदुरा किनार्‍यावरील दक्षिण मणलूर हें गांव पाण्डयांची राजधानी होती. दंतकथेवरून असें दिसतें कीं, कोरकाई हीच राजधानी व पाण्डय, चेर, चोल या तीन पौराणिक भावांची जन्मभूमि असून सार्‍या दक्षिण हिंदुस्थानांतील सुधारणेचें हें माहेरघर होतें. त्यावेळीं हें फार भरभराटीचें
बंदर होतें, येथें मोत्यांचा व्यापार फार मोठा चाले व या व्यापारामुळें पाण्डयराज्याला भरपूर उत्पन्न होई. हल्लीं हें गांव ताम्रपर्णी नदीवर आहे. परंतु तें आतां अगदीं लहान खेडें राहिलें आहे. पुढें जेव्हां राजधानी मदुरेस गेली तेव्हांहि दर्यावरील व्यापार्‍याच्या देखरेखीसाठीं पाण्डययुवराज हा येथेंच राही म्हणून त्यास कोरकई आंदार अशी पदवी असे. कांहीं काळानें रेती येत येत हें बंदर रेतीनें भरून निघालें व त्यामुळें तें मागें पडत गेलें (७००).
त्या नंतर कायल हें नवीन बंदर तयार करण्यांत आलें. येथेंच १३ व्या शतकांत मार्कोपालो हा प्रवासी उतरला होता. त्यानें हें बंदर अतिशय श्रीमान असल्याचें लिहिलें आहे. येथें पोर्तुगीज लोकांनीं पुढें एक वखार स्थापिली होती परंतु कांहीं वर्षांनीं तेथेंहि गाळ व रेती येऊन तें बंद करावें लागलें. हल्लीं येथें कोळ्‍यांच्या झोपडया आहेत. कोरकई येथील टांकसाळींत जीं नाणीं पाडीत त्यांवर कुर्‍हाड व हत्तीचें चित्र असे. मदुरेच्या नाण्यांवर एक अथवा दोन मासे कोरीत. कात्यायनानें पाण्डयांचा उल्लेख केला आहे (ख्रि. पू. ४ थें शतक). मेगॅस्थेनीसनोंहि पाण्डयांची एक दंतकथा दिली आहे. कुलशेखर पाण्डय हा या सर्व वंशाचा मूळपुरुष असून त्यानें मदुरा स्थापिली. तो चंद्रवंशी होता.

ग्रीक व रोमन लोकांना पाण्डय देशाची माहिती चांगली होती. ते या देशाशीं व्यापार करीत असत. मदुरा येथें नदीच्या वाळवंटांत रोमन नाणीं सांपडतात. स्ट्राबो म्हणतो कीं, पांडियन राजानें ऑगस्टस कायसर (ख्रि.पू.२०) याच्याकडे वकील पाठविलें होते. पेरिप्लसचा (८०) कर्ता व भूगोल
वेत्ता टॉलेमी (१४०) यांनां पाण्डय देशातील निरनिराळ्या बंदरांची व बाजारपेठांची उत्तम माहिती होती. अलेक्झाड्रा येथील करकल्लाच्या कत्तलीमुळें (२१५) रोमन लोकांचा ईजिप्त व दक्षिणहिंदुस्थान येथील व्यापार बुडाला.

प्राचीन पाण्डयराजांची माहिती नक्की सांपडत नाहीं अलीकडे ती मिळूं लागली आहे; पण त्यांतील नांवाचा व कालांचा गोंधळ आहे. अशोकाचे धर्मप्रसारक पाण्डय देशांत आले होते. अशोकानंतर आंघ्रांच्या साम्राज्याखालीं पाण्डय राज्य होतें. ज्याला कांहीं ऐतिहासिक महत्त्व देतां येईल असा नेदुमचेलियन नावाचा पाण्डय राजा हा पहिला होय. हा दुसर्‍या शतकांत झाला; त्यामुळें तो नेडुमुडी किल्ली चोल (करिकल चोलाचा नातू) राज व चेंकुत्तुवन चेरराज आणि सिंहलद्वीपचा पहिला गजबाहु यांचा समकालीन होता. गजबाहु याचा काल (१७३-१९१) बहुतेक ठरला आहे. या पाण्डय राज्यांत एक अतीशय महत्त्वाची संस्था त्या वेळीं असे. ती वाङ्मयविषयक असून मदुरा येथें असे. तिला संगम असे म्हणत. त्या संस्थेकडून विद्येस उत्तेजन मिळे. व तिचे सभासदहि स्वत: अनेक प्रकारचे उच्च दर्जाचे ग्रंथ लिहून वाङ्मयांत भर टाकीत. कूरल, मणिमेखला, शिळाप्पधिकारम् यासारखीं नांवाजलेलीं काव्यें व ग्रंथ पहिल्या व दुसर्‍या शतकांत झाले. ह्युएनत्संग हा ६४० सालच्या पावसाळ्‍यांत कांची येथें बरेच दिवस राहिला होता. तो स्वत: पाण्डय देशास गेला नव्हता तरी पण कांची येथें त्यानें पाण्डयाबद्दल ऐकीव माहिती मिळविली. त्यानें पाण्डय देशाला मलकूट (मदुरा) म्हटलें आहे. या वेळीं पांडयराज हा कदाचित कांचीच्या नरसिंह पल्ल्वराजाचा मांडलिक असावा. पांडय देशांत बौद्धधर्म मुळींच राहिला नव्हता. जैन व हिंदुधर्म भरभराटींत असून त्यांचीं देवळें व मठ पुष्कळ होते आणि बौद्ध विहारांचा नाश झाला होता. तेथील लोकांचें लक्ष्य विद्येपेक्षां व्यापाराकडे, विशेषत: मोत्यांच्या व्यापाराकडे फार होतें. एका शिलालेखांत, आठव्या शतकाच्या मध्यापासून दहाव्याच्या आरंभापर्यंतच्या कालांत झालेल्या पाण्डय राजांनीं नांवें आलीं आहेत. परंतु त्याशिवाय जास्ती माहिती त्यांत नाहीं. आठव्या शतकांतील अरिकेसरी पाण्डयानें पल्लवांचा पराभव केला. वरगुणवर्ग पाण्डयाचें राज्यारोहण ८६२-६३ सालीं झालें. यावेळीं चोल राज्य बहुतेक नामशेष झाल्यामुळें पाण्डयांचा व पल्लवांचाच झगडा चालू असे. तसेंच आसपासच्या राजांशींहि पाण्डय झटाझटी करीत. असल्या झटापटीचें बरेंचसें वर्णन शिलालेखांतून आलेलें आहे; परंतु त्यांत विशेष लक्ष देण्यासारखें कांहीं नाहीं. मात्र पाण्डयांनीं वेळ येईल त्याप्रमाणें दबून अथवा चढाईकरून आपलें अस्तित्व पुष्कळ शतकांपर्यंत ठेविलें होतें. प्रख्यात राजराज चोलानें पाण्डय राजाला आपला मांडलिक बनविल्यापासून (९९४) पुढें दोन शतकांपर्यंत पाण्डय दबलेलेच राहिले. तेराव्या शतकाच्या पूर्वार्धांत मात्र त्यांनीं आपले डोकें वर काढिलें. या राजांनीं पुढेंज जैन धर्माचा फार छळ केला. ह्युएनत्संगाच्या कांची येथील मुक्कामानंतर ही गोष्ट घडली (६४०). कून किंवा सुंदर उर्फ नेडुमारण हा पाण्डयराज प्रथम जैन (कांहींच्या मतें बौद्ध) धर्मानुयायी होता (१०६४). त्याची बायको चोल राजकन्या होती. चोल राजे हे कट्टे शैव होते. त्यामुळें सुंदराला त्याच्या राणीनें व तिरुज्ञानसंबंदर या साधूनें जैन धर्माचा त्याग करावयास लावून शैव धर्मी बनविलें. पुढें या सुंदर राजानें जैनधर्मी लोकांचा फार छळ केला. कोणी म्हणतात कीं त्यानें ८ हजार जैन लोक (ते आपला धर्म सोडीनात म्हणून) ठार केले. यांत अतिशयोक्ति असावी, पण एवढें खरें कीं, या वेळेपासून दक्षिणेंतून जैन धर्माचें प्राबल्य पुष्कळ कमी झालें. या घराण्यांतील वरगुण पाण्डया वा गंगराजानें कुंभकोणाजवळ पराभव केला होता.

सिंहलद्वीपच्या राजांचीं व पाण्डयांचीं नेहमीं युध्दें होत असत. त्यांतील सिंहलद्वीपच्या पराक्रमबाहूनें पाण्डय देशावर केलेली स्वारी (११६६) फार प्रख्यात आहे. याबद्दची हकीकत महावंशांत व अर्पक्कम येथील शिलालेखांत आलेली आहे. त्यावरून दिसतें कीं, प्रथम जरी पराक्रमबाहूचा जय झाला, तरी अखेरीस दक्षिणेंतील बहुतेक राजांनी पाण्डय राजास मदत करून पराक्रमबाहूस तोंड देऊन त्याचा पराभव केला. यापुढील ११०० ते १५६७ पर्यंतच्या पाण्डय राजांचीं नांवें व काळ कीलहॉर्न यानें दिला आहे. परंतु त्या राजांपैकीं कांहीं निव्वळ जहागीरदार आहेत. कुलोत्तुंग चोलानंतर चोल राज्य नामशेष करण्यास पाण्डय राजा हा काकतीय व केरल राजा यांचा मदतनीस होता (१८१८). या काळांतील जयवर्मन सुंदर (१२५१-७१) हा शूर असून, यानें नेल्लोर ते कन्याकुमारीपर्यंतचा सर्व पूर्व किनारा हस्तगत केला होता. पुढें (१३१०) मलिककाफर यानें जरी स्वारी केली तरी हें पाण्डय संस्थान सर्वस्वीं नष्ट झालें नाहीं साधारणपणें पाण्डय राज्याची मर्यादा उत्तरेस वेल्लार नदी, दक्षिणेस कन्याकुमारी, पूर्वेस कारोमांडल किनारा व पश्चिमेस त्रावणकोर संस्थानांतील अछहनकोवील (मोठी वेस) घाट अशी असे. पाण्डय हें नांव पाण्डवांचा बाप पण्डु याच्यापासून निघालें व पाण्डयन् हा त्याचा तामील अपभ्रंश आहे असें काल्डवेल वगैरे म्हणतात, बर्नेलचें मत, मूळ शब्द पाण्डयन् व पाण्डय हें त्याचें संस्कृतीकरण होय. 

जरी या वंशांतील पुरुषांची माहिती नक्की आढळत नाहीं, तरी जी आढळते तिचा अगदीं त्रोटक सारांश पुढें देतों. याचा मूळपुरुष कुलशेखर त्यानेंच मदुरा स्थापिली. त्याचा पुत्र मलयध्वज यानें चोल राजकन्येशीं लग्न लाविलें. त्याच्या मुलीचा मुलगा सुंदर हा पराक्रमी होता. तो व त्याची
बायको मीनाक्षी यांची त्या प्रांतांत अद्यापि देवासारखी पूजा करितात. याचा पुत्र उग्र, त्याचा वीर, नंतर अभिषेक, पुढें विक्रम, यानें जैनधर्म स्वीकारला. याचा पुत्र राजशेखर हा विद्वान् होता. याचा कुलोत्तुंग, त्याचा अनंतगुण हा जैनांचा द्वेष्टा होता. त्याचा कुलभूषण, याच्यावर चेदिराज चालून आला होता, पण उलट त्याला माघार घ्यावी लागली. कुलभूषणाचा राजसिंह, त्याचा राजेंद्र, यानें चोल राजकन्येशीं जबरीनें लग्न केल्यानें दोघांची लढाई झाली व तींत चोलांचा मोड झाला. राजेंद्राचा राजेश (राजेश्वर), त्याचा राजगंभीर त्याचा वंशप्रदीप, त्याचा पुरुहूत, त्याचा वंशपताक, त्याचा सुंदरेश्वर पादशेखर, यानें पुष्कळ देवळें बांधिलीं, याचें व चोलांचें युद्ध झालें. याचा पुत्र प्रख्यात वरगुण. याच्या कारकीर्दीत भद्रय्या नांवाचा नामांकित गवई झाला. वरगुणानें चोलांचा पराभव केला व चेरांस मांडलिक बनविलें. याच्या नंतर २६ वा पुरुष कीर्तिभूषण झाला. या राजाच्या वेळीं ह्या घराण्याची ही पहिली शाखा नष्ट होऊन दुसरी प्रसिद्धीस आली. तिचा प्रस्थापक वंशशेखर होय. नदीच्या पुरानें मदुरा वाहिली त्यामुळें यानें तिची नवी वसाहत करून तट वगैरे बांधला; चोलांचा पराभव केला व (कांहींच्या मतें यानेंच) संगम ही विद्वत्सभा स्थापिली. याच्यानंतरचा १६ वा पुरुष कुलेश हा विद्वान होता. अरिमर्दन, यानें जैनांनां फार छळिलें. याचा प्रधान माणिक्य हा फार विद्वान व शैवपंथी असून त्यानेंच वरील जैनांच्या छळास सुरुवात केली. अरिमर्दनाचा दहावा वंशज कून ऊर्फ कुब्ज किंवा सुंदर याचें वर्णन वर आलेंच आहे. यानें चोलांचा नाश करून उरय्यूर व तंजावर जाळलें व त्यांनां मांडलिक बनवून एका चोल राजपुत्राला पाण्डय ही पदवी दिली. कून याच्यावेळीं मदुरा येथें अरब लोक आले होते. याचा पुत्र वीर हा या पाण्डय शाखेचा शेवटचा (७४ वा) पुरुष होय. याला औरस संतति नव्हती, मात्र त्याचे दासीपुत्र पुष्कळ होते; त्यांच्यांत हें राज्य वाटलें गेलें.

यापुढें जी तिसरी वंशावळ मिळते ती सोमशेखरपासून मिळते. त्याच्यापासून ६ वा मेरुसुंदर यानें चोल-चेर यांनां जिंकिलें. याचा ४ था वंशज मकरध्वज हा फार शूर होता. याचा नातू कुवलयानंद यानें दर्यावरील व्यापार वाढविला. हा दर्यावरील सफरींत असतांच वादळानें बुडून मेला. याचा
२७ वा वंशज पराक्रमराज उर्फ सुंदर हा मलिक काफरच्या वेळीं होता (१३११). यानें आपल्या बापाचा खून केला, तेव्हां याला त्याचा भाऊ वीरराज यानें हाकलून दिलें. त्यानें मलिक काफरास मदत केली व मदुरा त्यांच्या हातीं दिली. त्यामुळें प्राचीन पाण्डय राज्य समूळ नाश पावलें यापुढें ६० वर्षे मदुरेस मुसुलमानांचा अंमल होता (१३११-७२). शेवटचा मुसुलमान जहागीरदार फंदक मलिक यास विजयानगरचा सेनापति कंपन उडैयार यानें जिंकून मदुरा घेतली. नंतर या उडैयार घराण्यानें व निरनिराळ्या नायक राजांनीं येथें राज्य केलें. (१३७२-१६२३). मुसुलमानांनीं पाडून टाकलेलीं मदुरेचीं चार गोपुरें या नायकांनीं पुन्हां बांधिलीं. हे नायक विजयानगरचे मांडलिक असत. त्यांच्यांत प्रख्यात विश्वनाथ नायक झाला (१५५९). वरील (१३७२-१६२३) काळांत मदुरेच्या खालच्या भागांत एक पाण्डय घराणें जहागिरदाराप्रमाणें अस्तित्वांत होतें. ह्या पाण्डय राजांचीं नावें शिलालेखांतून आलेलीं आहेत. शेवटचा राजा सुंदर पाण्डय हा १६२३ त होता त्याचा बाप अतिवीर हा तामीळ कवि व विद्वान होता. त्याची तामीळ प्रांतांत अद्यापि प्रख्याति आहे. पुढें या सर्व पाण्डयांची सत्ता तिरुमल नायक्क (१६२३-५९) यानें नष्ट केली पाण्डय राजांच्या कालांनुक्रमाची एक सविस्तर यादी कै. दि. ब. स्वामी कन्नू पिल्ले यांनीं निरनिराळ्या शिलालेख व ताम्रपटांवरून एपि. इंडिकामध्यें व इंडि. अँटिक्वरी, पु. ४२ पृ. १६३-७२ व २२१ २९ मध्यें दिली आहे. तिच्यावरून एकाच काळीं पांच पाण्डय घराणीं राज्य करींत होतीं असें त्याचें म्हणणें आहे.

[ संदर्भग्रंथ:- विल्सन-हिस्टॉरिकल स्केच; नेल्सन-मदुरा कंट्री एम्यानुअल; काल्डवेल-हिस्टरी ऑफ तिनेवेल्ली; प्लीनी टॉलेमी; तामांळूस एटीन हंड्रेड इयर्स ऍगो; इंडि. अँटि. पु. ६, १८ कॉईन्स ऑफ तिनेवेल्ली; भांडारकर-आर्लि हिस्टरी ऑफ धि डेक्कन; स्ट्रॅबो; फोक साँग्ज ऑफ सदर्न इंडिया; 
आय्यंगार-एन्शन्ट इंडिया, त्रावणकोर अर्किआलॉजिकल सेरीज. पु. ७.]

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे