धारवाड, जि ल्हा.- मुंबई इलाख्याच्या दक्षिण भागांतील एक जिल्हा.
विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ
धारवाड, जि ल्हा.- मुंबई इलाख्याच्या दक्षिण भागांतील एक जिल्हा. क्षेत्रफळ ४६०२ चौरस मैल. मर्यादा:- उत्तरेस बेळगांव व विजापूर जिल्हे; पूर्वेस निजामचें राज्य, तुंगभद्रा नदी व तिच्या पलीकडे मद्रास इलाख्यांतील बल्लारी जिल्हा; दक्षिणेस म्हैसूर संस्थान व पश्चिमेस उत्तर कानडा जिल्हा. लांबी ११६ मैल व रुंदी ७७ मैल. धारवाड जिल्ह्याचे ठोकळ मानानें दोन भाग असून त्यांचे बाह्य स्वरूप, जमीन व उत्पन्न निरनिराळें आहे. साधारणपणें या दोन भागांच्या मधून बेळगांव- हरिहर हा रस्ता जातो. या रस्त्याच्या उत्तरेस व ईशान्ये नवलगुंद, रोन व गदग तालुक्यांच्या कांहीं भागांत, एकसारखी काळी जमीन असून तींत कापसाचें चांगलें पीक होतें. या मैदानाच्या आग्नेय भागांत कप्पतचें डोंगर आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागांत, मलप्रभेच्या दक्षिण तीरापासून म्हैसूर सरहद्दीपर्यंत डोंगराच्या लहान लहान पुष्कळ रांगा असून त्यांच्यामध्यें लागवड केलेलीं सपाट खोरीं आहेत. जलविभाजक क्षेत्राच्या माथ्यावर हा जिल्हा असल्यामुळें ह्यांत मोठ्या नद्या मुळींच नाहींत. मुख्य सात प्रवाहांपैकीं ६ बंगालच्या उपसागरास मिळतात, व एक अरबी समुद्रास मिळतो. पूर्वेकडे वहाणाऱ्या मलप्रभा व तिला मिळणारी वेण्णीहल्ल, तुंगभद्रा व तिला मिळणाऱ्या वरदा,कुमुद्वती, वरदेला मिळणारी धर्मनदी, पश्चिमेकडे वहाणारी बेत्तिनुल्ला किंवा गंगावली या नद्या आहेत यांपैकीं फक्त धर्मनदीच्या पाण्याचा शेतकीकडे उपयोग करतात.
धारवाड, कलघटगी, व बंकापूरच्या जंगलांत सागाचीं झाडें आहेत. यांत पुष्कळ प्रकारचें बांबूहि असून नांदुरकी, खैर, बाभूळ, हिरडा, उंबर, चिंच. चंदन, शिसू वगैरे झाडें होतात. ह्या जिल्ह्यांत दक्षिण हिंदुस्थानांत सांपडणारे सर्व प्राणी आढळतात. मुंबई इलाख्यांत येथील हवा सर्वांत उत्तम आहे. डिसेंबर ते जानेवारीपर्यंत दंव बरेंच पडतें. फेब्रुवारीपासून एप्रिलच्या मघ्यापर्यंत उन्हाळा असतो, जानेवारींत उष्णमान ८००, मे महिन्यांत ९८० व पावसाळ्यांत ९१०असतें. नैर्ऋत्येकडील व ईशान्येकडील पावसाळी वारे ह्या जिल्ह्यावरून वहात असल्यामुळें जून ते डिसेंबरपर्यंत पावसाळा असतो; व सबंध वर्षांत पाऊस सरासरी ३३ इंच पडतो.
इतिहास:- या जिल्ह्यांत हनगल येथें पांडव रहात होते असा समज आहे. ख्रि. पू. पहिल्या शतकांत, उत्तर कानड्यांत बनवासीच्या राजांच्या ताब्यांत धारवाडचा कांहीं भाग असावा असें ताम्रपटांवरून समजतें. या आंध्रमृत्यू घराण्यानंतर गंग किंवा पल्लव राजे व नंतर कंदब नांवाचें जैन घराणें होऊन गेलें. यापुढील इतिहासाचे तीन भाग पडतात. पूर्व चालुक्य व पश्चिम चालुक्य (६०० ते ७६०); राष्ट्रकूट (९७३ पर्यंत); पुन्हां पश्चिम चालुक्य (९७३ ते ११६५); कलचुरी (११६५-८४); होयसळ (११९२- १२०३), व देवगिरीचे यादव (१२१०-९५). यादवांच्या वेळीं येथें कदंब नांवाचे मांडलिक राजे असून, त्यांची राजधानी बनवासी व हनगल येथें असे. स. १३१० त मलिक काफरनें कर्नाटक उजाड केलें व दक्षिणेकडील जिल्ह्यांवर महंमद तध्लखानें पुन्हां स्वारी केली. पुढें हा जिल्हा विजयानगरच्या राज्यांत सामील झाला. तालिकोटच्या लढाईपूर्वी थोडे दिवस, हा जिल्हा विजापुरच्या सुलतानानें जिंकून घेतला. १६७३ सालीं अण्णाजी दत्तो यानें हुबळी शहर लुटलें व स. १७२६ त बाजीरावानें हा देश उध्वस्त करून टाकला. याप्रमाणें मोंगलांच्या मागून मराठ्यांनीं धारवाडवर आपला हक्क स्थापित केला. पुढें स. १७६४ त हैदरअल्लीनें मराठ्यांनां हुसकून लावून हा जिल्हा आपल्या ताब्यांत घेतला; पण पुढल्याच वर्षी माधवराव पेशव्यानें हैदरचा पराभव करून तो परत मिळविला. मध्यंतरी हैदर व टिप्पू यांनीं कांहीं वेळपयर्त ह्याचा पुन्हां ताबा घेतला, तरी स. १७९० त मराठ्यांनीं धारवाड काबीज केलें. १८३६ सालीं बेळगांव जिल्हा निराळा करून याचा आकार कमी करण्यांत आला.
धारवाड जिल्ह्यांत चालुक्य पद्धतीचे पुष्कळ सुंदर नमुने दिसतात. गदग, लकुंडी, डंबल, हावेरी आणि हनगल येथें चालुक्यांच्या वेळचे शिलालेख व स्मारकचिन्हें आहेत. सर्व जिल्हाभर जुने किल्ले. सुंदर आणि नक्षीदार इमारती आहेत: आण्णिगेरी, बंकापूर, चौददामचूर. लक्ष्मेश्वर, आणि नरेगल वगैरे गांवीहि महत्त्वाचे शिलालेख असलेल्या इमारती आहेत. ९ पासून १३ व्या शतकांत चुन्याशिवाय बांधलेल्या सुंदर जखणाचार्यां देवालयांचें अवशेष आहेत. जखणाचार्य हा राजा होता; त्याच्या हातून चुकून घडलेल्या ब्रह्महत्येचें क्षालन करण्याकरितां, काशीपासून रामेश्वरापर्यंत देवालयें बांधण्यांत त्यानें २० वर्षें घालविली. जखणाचार्यी देवालयें, हेमाडपंती देवालयांसारखीं असतात. जिल्ह्याची लोकसंख्या (१९२१) १०३६९२४. पैकीं शेंकडा ८६ हिंदू, शें. १२ मुसुलमान व शेंकडा १ जैन आहेत. मुख्य भाषा अशुद्ध कानडी आहे; वरच्या वर्गांनां मराठी समजतें. जिल्ह्यांत लिंगायतांची संख्या बरीच मोठी आहे. शेंकडा ६२ लोक शेतकीवर व शेंकडा ४ लोक मजुरीवर पोट भरतात.
शेतकी:- तांबडी, काळी, व चिकण मातीची भुरकट जमीन, अशी तीन प्रकारची जमीन या जिल्ह्यांत आढळते. काळ्या जमिनींत कापूस चांगला पिकतो; ती वर्षांतून एक वेळच नांगरावी लागते व तिला खताची जरूर सहसा नसते. पण तांबड्या जमिनीला साधारणपणें खत देतात व वर्षांतून तीन किंवा चार वेळ नांगरतात. मुख्यत: रयतवारी पद्धत चालू असून सुमारें ४०० चौरस मैल जागा इनामी आहे. कलघगटी, हनगल व कोद हे तालुके सोडून इतर ठिकाणीं मुख्यत: ज्वारीचें पीक होतें; ह्या व पश्चिमेच्या तालुक्यांत भात हें मुख्य पीक आहे. याशिवाय गहूं, तूर, हरभरा, कुळीथ, ऊंस मिरची वगैरे पिकेंहि होतात.
मुंबई इलाख्यांत कापसाच्या उत्पन्नांत या जिल्ह्याचा पहिला नंबर असून येथील कापूसहि चांगल्या प्रतीचा असतो. स. १८२९ त बाहेरचें बीं आणून येथें कापसाची लागवड करण्याचे प्रयोग सरकारनें सुरू केले पण त्यांत यश न आल्यामुळें स. १८३६ त त्यांनीं आपले प्रयत्न बंद केले. पुढें १८४० सालीं कांहीं अमेरिकन शेतकऱ्यांनीं हुबळीच्या ईशान्येस ५ मैलांवर अमेरिकन कापसाच्या लागवडीचे प्रयोग सुरू केले. त्यांनां जरी प्रथम चांगलें यश आलें नाहीं तरी त्यांची भरभराट होत गेली व अमेरिकन कापसाला देशी कापसापेक्षां भाव चांगला असल्यामुळें, शेतकरी लोकहि या कापसाची पुष्कळ लागवड करूं लागले.
धारवाडी घोडे पूर्वी चांगले म्हणून समजले जात असत, पण इराणी व अबिसीनियन यांच्या स्वाऱ्यांत त्या जातीचे बहुतेक घोडे कामास आल्यामुळें हल्लींची जात खुजट, बेढब व हलक्या दर्जाची अशी दृष्टीस पडते. लागवडीच्या जमिनीपैकीं शेंकडा ४ एकरांनां कृत्रिम रीतीनें पाणी देण्याची सोय आहे. बहुतेक टांकीं व तलाव जुने असून विजयानगरच्या वेळेपासून (१३३६-१५६५) अस्तित्वांत असावेत असा समज आहे. यांपैकीं करजगी तालुक्यांत हावेरी येथील, बंकापूर तालुक्यांत नागनूरचें व गदग तालुक्यांत डंबल येथील तळीं मुख्य आहेत कालव्यांपैकीं धर्मानीच्या दक्षिण तीराचा कालवा मुख्य आहे. धारवाडचा बराच भाग वृक्षरहित आहे. अरण्याचे दोन भाग आहेत, ते पश्चिमेकडील तालुक्यांतील घनदाट अरण्यें, आणि पूर्व व दक्षिणच्या तालुक्यांतील रुक्ष अरण्यें हे होत. या घनदाट अरण्यांत चंदनाचीं व सागाची झाडें होतात. पूर्वी ह्या जिल्ह्यांत सोनें पुष्कळ सांपडत असे असें म्हणतात; व अद्यापहि कप्पत डोंगर व त्यांतून निघणाऱ्या नद्यांच्या पात्रांत थोडेंबहुत सोनें सांपडतें. पश्चिम भागांत पूर्वी मोठ्या प्रमाणावर लोखंड गाळण्यांत येत असे; पण हल्लीं सर्पणाभावीं हा धंदा फारच अल्प प्रमाणावर चालतो.
व्यापार व दळणवळण:- सुती व रेशमी कापड, घरगुती कामास लागणारीं नेहमीचीं भांडीं व दागिने हे जिन्नस तयार होतात. मोठ्या गांवीं कापड विणण्याचा धंदा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर चालतो. नवलगुंद येथें सुंदर गालिचे करतात. धारवाड येथें कांचेच्या बांगड्या तयार होतात. हुबळी व गदग येथें सरकी काढण्याच्या, कापूस दाबण्याच्या आणि सूत काढण्याच्या गिरण्या आहेत.
व्यापाराचीं मुख्य ठिकाणें:- हुबळी, धारवाड, नवलगुंद, गदग, व राणीबेन्नूर. कापूस हा मुख्य निर्गत पदार्थ असून विलायती कापड, मिरच्या, नारळ, गूळ व सुपाऱ्या हे जिन्नस म्हैसूर आणि कानडा येथून येतात. ज्वारीचा स्थानिक व्यापारहि बराच मोठा आहे. बहुतेक व्यापारी ब्राह्मण व लिंगायत आहेत. सदर्न मराठा रेल्वेचा मुख्य फांटा अलनावरजवळ ह्या जिल्ह्यांत शिरून पूर्वेस हुबळी व गदग या गांवांवरून गेलेला आहे. हुबळीपासून एक शाखा आग्नेयीकडे निघून हरिहरजवळ म्हैसूर प्रांतांत शिरते; व गदगपासून दुसरी शाखा उत्तरेस विजापूरकडे जाते. धारवाडहून कुमठा, कारवार व वेंगुर्ले या बंदरांनां जाण्याकरितां उत्तम रस्ते झालेले आहेत.
राज्यव्यवस्था:- धारवाड जिल्ह्यांत ११ तालुके व दोन पेटे आहेत. ते येणेंप्रमाणें:- धारवाड, हुबळी, गदग (मुंदरगी पेट्यासह), नवलगुंद (व नरगुंद पेटा), बंकापूर, रोण, राणिबेन्नूर, कोद, हनगल, करजगी व कलघटगी. येथील कलेक्टर हा सवानूर संस्थानचा पोलिटिकल एजंट असतो. जमिनीवर पट्टी बसविण्याकरितां विजयानगरच्या कृष्णरायानें (१५०९-२९) रायरेख नांवाचें माप सुरू केलें. त्याकालांत जमाबंदीच्या वेळीं फक्त जिराइत जमिनीची मोजणी होत असे व बागाईतींत जितकें बीं पेरलें जात असेल त्या-त्याप्रमाणें अमुक खंडीची जमीन आहे असें म्हणत असत. विजापूर, सावनूर व मराठी राज्यांत हीच पद्धत सुरू होती. ब्रिटिश अमदानींत पहिली जमाबंदी १८४३ सालीं झाली. त्यानंतर उत्तरोत्तर करांचें उत्पन्न वाढत आहे. या जिल्ह्यांत धारवाड शहर, हुबळी, गदग, नवलगुंद, यमनूर, नरगुंद, राणीबेन्नूर, गुड्डुगुड्डापूर, ब्यादगी, व हावेरी येथें म्युनिसिपा लिट्या आहेत. यांशिवाय इतर ठिकाणचा स्थानिक कारभार जिल्हाबोर्ड व तालुकाबोर्डें यांच्याकडे आहे. साक्षरतेच्या बाबतींत मुंबई इलाख्यांतील जिल्ह्यांमध्यें धारवाडचा सहावा नंबर लागतो.
ता लु का.- धारवाड तालुक्याचें क्षेत्रफळ ४३२ चौरस मैल आहे. या तालुक्यांत धारवाड व हुबळीं हीं दोन मोठीं गावें असून खेडीं १२९ आहेत. लोकसंख्या (१९११) १०६४५६. हा तालुका डोंगराळ असून उत्तर व पूर्व भागांत काळी जमीन आहे. येथें पाऊस ३४ इंच पडतो.
गांव.- हें गांव मद्रास सदर्न मराठा रेलवेच्या फांट्यावर आहे. लोकसंख्या (१९११) ३०२८९ येथें एक पडीक किल्ला आहे. पश्चिमेस पश्चिम घाटापासून निघालेल्या लहान डोंगरांच्या रांगा मैदानापर्यंत जातात. झाडीमुळें पूर्वेच्या बाजूनें गांव व किल्ला हीं दृष्टीआड झालेलीं आहेत. गांव समुद्रसपाटीपासून २५८० फूट उंचीवर आहे. उंच जागीं असलेल्या कलेक्टर कचेरीजवळच उल्बो बसाप्पाचें देवालय व त्याच्या पलीकडे धारवाड किल्ल्याचें जणूं नाकच अशी मैलारलिंग टेंकडी आहे. येथील देवळांत दोन फारशी शिलालेख आहेत. त्यावरून स. १६७० त आदिलशहानें प्राचीन देवळाची मशीद केल्याचें समजतें. पुढें पेशव्यांनीं पुन्हां देऊळ बांधून मल्लारलिंगाची स्थापना केली. गांवाबाहेर पूर्वेस नवलगुंद व नरगुंद टेंकड्यापर्यंत, व ईशान्येस येलम्माची टेंकडी व परसगडपर्यंत काळ्या जमिनीचीं विस्तीर्ण मैदानें पसरलेलीं आहेत. आग्नेयीस ३६ मैलांवर मुलगुंडची टेंकडी दिसते.
किल्ला केव्हां बांधला गेला यासंबंधी विश्वसनीय माहिती मिळत नाहीं. विजयानगरच्या हिंदू राजाच्या कारकीर्दीत धारराव नांवाच्या जंगलअधिकाऱ्यानें हा किल्ला स. १४०३ त बांधला अशी स्थानिक दंतकथा आहे. त्याचें क्षेत्रफळ ७६ एकर असून मुख्य वेस उत्तरेस असून तिच्या आंत पूर्वाभिमुख तीन दरवाजे आहेत. बालेकिल्ला व मुख्य किल्ला या दोहोंभोंवती खंदक होता. दुसऱ्या दरवाजावर शिलालेख (फारशी) आहे. तटाचें काम हिंदु पद्धतीचें आहे. शिलालेखावरून स. १६६०त दुरुस्ती झाली असें दिसतें. स. १५७३ त विजापूरचा सुलतान अदिलशहा ह्या किल्ल्यावर चाल करून आला व त्यानें सहा महिनेपर्यत वेढा देऊन सर केला शिवाजीनें स. १६७४ त धारवाड जिंकलें होतें तें स. १६८५ त मोंगलाने घेतलें. नंतर तें पुन्हां १७५३ त मराठ्यांच्या हातांत गेलें. मध्यंतरी मराठे व हैदर यांच्याकडे किल्ला जाई परंतु पुन्हां १७८८ सालीं परशरामभाऊनीं तो परत घेतला. यावेळीं धारवाडचा वसूल १२०१३० रु. होता. भाऊनें टिप्पूपासून हा स. १७९१ त कायमचा घेतला. ह्या किल्ल्याची रचना चांगली असून नैसर्गिक रीत्याच तो मजबूत होता. १८५७ पर्यंत त्याची डागडुजी नीट होत असे पण अलीकडे तो मोकळीस आला आहे. स. १८७५ पर्यंत येथें लष्कर असे.
या गांवांत ७ महाल आहेत. गांवाभोंवतीं तट व पांच (मुदीहनुमान, नवलूर, नुचंबली, तेगूर व किल्ले असे) दरवाजे होते. स. १७५३ त भाऊसाहेब पेशवे यांच्या नांवाची सदाशिव पेठ वसविली (सांप्रतच् हावेरी पेठ). लोकवस्तीपैकीं ब्राह्मण व लिंगायत ह्या जाती भरभराटींत आहेत. कापूस, लांकूड व धान्य यांचा बहुतेक व्यापार लिंगायतांच्या हातीं आहे. पारशी व मारवाडी बहुधा कापडाचा व्यापार करतात. कापूस व धान्य हे मुख्य निर्गत जिन्नस व विलायती कापड, मिरची, नारळ, काकवी, गूळ, खजूर, सुपारी, किराणा माल, नीळ, शिसें, जस्त, तांबें व पितळ हें आयात जिन्नस होत. तुरुंगांत गालिचे, कापड व बेतकाम होतें. येथील म्युनिसिपालिटी स. १८५६ त स्थापन झाली. विहिरीचें पाणी खारें असल्यामुळें तलावाचें पाणी पितात. सर्वांत मोठा हिरेकरी तलाव असून कोपडकोरी, हलकेरी, लाल, परमनकट्टी हे लहान तलाव आहेत. धारवाडमध्यें एक कॉलेज, ३ हायस्कुलें आहेत. मुलकी व न्यायखात्यांच्या कचेऱ्यांशिवाय येथें मद्रास स. म. रेल्वेच्या एका विभागाची मुख्य कचेरी, रेलवे दवाखाना, सरकारी दवाखाना, व वेड्यांचे हॉस्पिटल हीं आहेत. येथें पुष्कळ देवळें असून सर्वांत जुनें व्यासरायाचें रायर हनुमानाचें देऊळ आहे. इ. स. १५१० च्या सुमारास विजयनगरकरांनीं जीं सर्वत्र ३६० मारुतीचीं देवळें बांधलीं त्यांपैकीं हें एक आहे. [फ्लीट-डिनॅस्टीज ऑफ धि कानडी डिस्ट्रिक्स; बाँबे रिव्हि. सेटलमेंट: धारवाड ग्याझे: पेशव्यांची बखर: डफ: मर-नॅरे-टिव्ह; वेरिंग-मराठाज; स्टोक-बेळगांव.]
Comments
Post a Comment