महावंश - महाराष्ट्र

महाराष्ट्र, प्र दे शा ची व्या प्ति.- महाभारतांत महाराष्ट्र हें नांव नाहीं. बौद्ध ग्रंथ जो महावंश त्यांत महाराष्ट्र असा उल्‍लेख आहे. त्यावरून त्यावेळी उज्जैनीभोंवतालच्या बऱ्याच मोठया प्रदेशास म्हणजे आजच्या मध्यहिंदुस्थानास महाराष्ट्र म्हणत असावेत. ऐहोळच्या शिलालेखान्वयें या देशाचे महाराष्ट्रक नांवाचे तीन विभाग असून इ. स. सातव्या शतकांत या देशांत ९९००० खेडीं होतीं अथवा असल्याची दंतकथा होती असें दिसतें.

पूर्वी विदर्भ देशासच महाराष्ट्र हा शब्द लावीत. राजशेखरच्या बालरामायणांत विदर्भ व महाराष्ट्र हीं नांवें एकाच देशाबद्दल योजिलीं आहेत. (बा. र. १०. ७४). अनर्घराघवांतहि ''इदाग्रि महाराष्ट्रमंण्डलैकमण्डनं कुंडिनं नाम नगरम्।'' असा कुंडिनपुरचा निर्देश केला आहे. ह्युएनत्संगाच्या वेळीं महाराष्ट्रा (मोहोलोच) चा घेर १००० मैल होता. उत्तरेस माळवा, पूर्वेस कोसल आणि आंध्र, दक्षिणेस कोंकण, आणि पश्चिमेस समुद्र या त्याच्या मर्यादा होत्या. त्याची राजधानी भडोचपासून १६७ मैल दूर होती.

तथापि अमुकच प्रदेशाचें नांव महाराष्ट्र होतें असें निश्चित नाहीं. मराठयांचें राज्य ज्या प्रदेशावर पसरलें त्याला महाराष्ट्र असें नांव देण्याचा प्रघात असे. पण मराठी राज्य फार काळ न टिकल्यामुळें व त्याचा नेहमीं वृद्धि-संकोच होत असल्यामुळें हें नांव कोणत्याहि एका विशिष्ट प्रदेशास रूढ झालें नाहीं. आज मराठी भाषा ज्या भागांत प्रामुख्यानें चालते त्याचा महाराष्ट्रांत अंतर्भाव करण्याची वहिवाट आहे. मुंबई इलाख्यांतील रत्नागिरी, कुलाबा, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणें, पूर्व व पश्चिम खानदेश, सोलापूर हे जिल्हे व मुंबई शहर; व वऱ्हाड-मध्यप्रांतांतील बुलढाणें, अकोला, वर्धा, उमरावती, नागपुर, भंडारा, चांदा व यवतमाळ हे जिल्हे महाराष्ट्रांत या दृष्टीनें धरतां येतील. या वरील दोन इलाख्यांतील जिल्ह्यांचा अनुक्रम मराठी बोलणारांच्या संख्येवरून उतरत्या क्रमानें  लाविला आहे. दक्षिण महाराष्ट्रांतील कोल्हापुरादि संस्थानें, बडोदें, ग्वाल्हेर, इंदूर, धार, देवास इत्यादि संस्थानांतून मराठी भाषा चालते. पण दक्षिण महाराष्ट्रांतील कांही संस्थानें व कदाचित् बडोदें यांखेरीज इतरांचा 'महाराष्ट्र' या प्रोदशिक विभागांत अंतर्भाव होत नाहीं.

इ ति हा स.- महाराष्ट्री असें एका प्राकृत भाषेचें नांव म्हणून इ. सनाच्या आरंभी माहीत होतें; तेव्हां देशाचेंहि नांव त्याच वेळीं प्रचारांत आलें असावें. रठ्ठी व महारठ्ठी अशीं नावें अनेक शिलालेखांतून येतात. पण महारठ्ठपासून महाराष्ट्र हा शब्द बनला कीं नाहीं याविषयीं विद्वानांत वाद आहे.

प्रथम महाराष्ट्रांत अशोकाचा अंमल असावा. त्यानंतर आंध्र राजे राज्य करूं लागले. यांचीच एक शातवाहन उर्फ आंध्रभृत्य म्हणून शाखा होती. या शातवाहन किंवा शालिवाहन राजांचे बरेच अवशेष महाराष्ट्रांत दृग्गोचर होतात. शालिवाहन घराणें सुमारें तीनशें वर्षे अधिकाररूढ होतें; मध्यंतरीं (इ. सनाच्या आरंभीं) सुमारें ५० वर्षे शकांचा अंमल होता. शालिवाहनांच्या काळीं महाराष्ट्रांत बौद्धसंप्रदाय जोरानें वावरत होता. शालिवाहनानंतर अभीर व राष्ट्रकूट यांचा उदय झाला. सहाव्या शतकांत चालुक्यांनीं उत्तरेकडून येऊन महाराष्ट्र जिंकला ('चालुक्य' पहा.) या पूर्व-चालुक्यांनीं इ. स. ५५०-७५३ पर्यंत, नंतर राष्ट्रकूटांनीं इ. स. ७५३-९७३ पर्यंत, त्यानंतर उत्तर-चालुक्यांनं इ. स. ९७३-११८९ पावेतों महाराष्ट्रावर राज्य केलें. नंतर यादववंश सुरू झाला. अल्लाउद्दीनानें यादवांचें राज्य स. १३१२ त खालसा केलें. यादवांच्या अमदानींत मराठी भाषा जोमानें पुढें येऊन तिच्या अर्वाचीन काळास प्रारंभ झाला. यादवांनंतर स. १३४७ पर्यंत दिल्‍लीच्या सुलतानांचा प्रत्यक्ष अंमल या भागावर होता. त्या सालीं बहामनी राजची स्थापना झाली. पंधराव्या शतकाच्या अखेरीस बहामनी राज्याचे तुकडे होऊन बेरीदशाही, इमादशाही, कुत्बशाही, आदिलशही व निझामशाही अशीं पांच राज्यें झालीं व त्यांच्यांत महाराष्ट्रहि विभागला गेला. पुढें मोंगलांकडे व मराठयांकडे महाराष्ट्राचें आधिपत्य आलें. शेवटीं इंग्रजांकडे हा प्रदेश जाऊन आज तो त्यांच्याच अंमलाखालीं पारतंत्र्यांत आहे.

म हा रा ष्ट्री य लो क, प्रा ची नः- प्रसिद्ध इतिहाससंशोधक राजवाडे आपल्या 'महाराष्ट्राचा वसाहतकाल' (इतिहास आणि ऐतिहासिक मासिक, ऐतिहासिक विविध विषय पृ. २९-२४२) या लेखांत व राधामाधव-विलास चंपूच्या प्रस्तावनेंत (प्यारा ८४ पासून पुढें) महाराष्ट्र नांवाची व्युत्पत्ति व महाराष्ट्रीयांचें परिभ्रमण व वंशनिश्र्चय देतात. त्यांच्या मतें मगधदेशाधिपति महाराजांचे जे भक्त  ते महाराष्ट्रिक बौद्धक्रांतीला कंटाळून दक्षिणारण्यांत शिरले (शकपूर्व सहाशेंच्या सुमारास). अशोकाच्या शिलालेखांत उल्लेखिलेले राष्ट्रिक ('रास्टिक') व हे महाराष्ट्रिक अगदीं निरनिराळे होत. या महाराष्ट्रिकांनी नर्मदेपासून भीमेपर्यंतचा सह्याद्रि किनारा व देवगिरीपासून पैठणचा प्रांत व्यापिला. कालांतरानें महाराष्ट्रिकांच्या खालच्या भागांतले वैराष्ट्रिक व राष्ट्रिक यांचाहि समावेश महाराष्ट्रिकांत होऊन या तिघांचे देश मिळून त्रिमहाराष्ट्रिक बनलें. सोळाशें वर्षेंपर्यंत दक्षिणेंत महाराष्ट्रिकांनीं स्वधर्मरक्षणार्थ वसाहती करण्याचें काम केलें. त्यांच्यावर अनेक अधिराजे होऊन गे पण त्यांच्या संस्कृतिसंवर्धनाच्या कामांत खंड पडला नाहीं. या लोकांची पहिली मोठी भरभराटलेली वसाहत म्हणजे पैठणप्रांतांतील गोदावरीच्या तीराची. परंतु हे महाराष्ट्रिक लोक बऱ्याच कनिष्ठ संस्कृतीचे होते. साम्राज्यें चालविण्याची कला जशी त्यांच्यांत नव्हती तशा उच्च प्रकारच्या कलाहि त्यांनां अवगत नव्हत्या. ते फक्त देशमुख्या पटकावण्याचा निरुपद्रवी उद्योग चांगला करीत. भाषेच्या व वाङ्मयाच्या प्रांतांतहि महाराष्ट्रिक असेच मागासलेले असत. या महाराष्ट्रिकांचा नाग लोकाशीं मिलाफ होऊन मराठे नांवाचें नवें राष्ट्र बनलें (शक चारशेंचा सुमार). या नागमहाराष्ट्रिकोत्पन्न मराठे लोकांवर वैदिक धर्म, उपासनामार्ग, वनदेवतापूजा, सर्पोपासना व बौद्धधर्म अशा पांच पंथांची छाप बसली होती. त्यांच्यांत राष्ट्रीय भावना किंवा एकजूट मुळींच नव्हती. चालुक्य, यादव, पल्लव, भोज इत्यादि महाराष्ट्रदेशनिवासी क्षत्रिय व महाराष्ट्र-ब्राह्मण या अल्पसंख्याकावर या बहुप्रज मराठयांचा पगडा बसून मराठयांची हीन संस्कृति सर्वसामान्य व सर्वमान्य झाली (सध्याच्या संस्कृतीकरितां, 'कुणबी' व 'मराठे' पहा.)

अर्वाचीनः- मराठी बोलणारांची संख्या आज सुमारे २ कोटी भरेल. पैकी मुंबई इलाख्यांतच जवळ जवळ निम्मी संख्या आहे; वऱ्हाड-मध्यप्रांतांत १/४ आहे. हैदराबाद संस्थानांत सुमारे ३५ लक्ष व मुंबई इलाख्यांतील संस्थानांतून सतरा अठरा लाख मराठी लोक आहेत. मद्रास इलाख्यासारख्या भिन्न संस्कृतीच्या भागांत देखील सुमारें तीन लाख मराठी बोलणारे आहेत. बाकीच्या प्रांतांतून लाखापेक्षां कमी आहेत. हिंदुस्थानांत ज्या प्रदेशांत मराठी भाषा कमी अधिक प्रमाणांत चालते तेथें एकंदर जनतेशीं महाराष्ट्रीयांचें प्रमाण काय पडतें याचें कोष्टकावर विवेचन 'वाङ्मयसूचीं' त (प्रस्तावना पृ. ८ पासून पुढें) सांपडेल. महाराष्ट्राबाहेर जे मराठे आहेत ते त्या त्या ठिकाणीं मराठे साम्राज्याच्या वसाहतकालीं मागेंच गेलेले किंवा आज पोट भरण्यासाठीं जाऊन राहिलेले आहेत. म्हैसूर संस्थानांत जे मराठे गेले ते शहाजी, शिवाजी व पेशवे यांच्या तिकडील स्वाऱ्यांबरोबर गेलेले आहेत;  त्यांपैकीं (८७४७६) हल्लीं कांहीं संस्थानी लष्करांत व कांहीं कानडी बनलेले रंगारी व शिंपी म्हणून आढळतील. कोचीन संस्थानांतील (२२२२५) कुणबी (कुडुमीचेट्टी) व कोंकणी ब्राह्मण (सारस्वत) गोंव्याकडून तिकडे गेलेले आहेत; येथील ब्राह्मण व्यापार करतात व कुडुमीचेट्टी मोलमजूरी व नाविकांचें काम करून रहातात. मराठयांच्या अमदानींत दिल्‍लीस दरबारी कामावर असलेल्या मंडळींपैकीं कांहीं पंजाबमध्यें जाऊन राहिले तेव्हां त्यांचे वंशज (७५६) तिकडे आढळल्यास नवल नाहीं. वायव्य सरहद्दीवरील पलटणींत कांहीं मराठे (२१९) आहेत. संयुक्तप्रांतांतील मराठयांच्या वस्तीपैकीं (६०२९) सुमारें निम्मे काशीक्षेत्रीं आहेत; त्याखालोखाल झांशीस मराठयांची वस्ती (१६५८) आहे. मध्यहिंदुस्थानांत मराठयांची जी २८००० वस्ती आहे तीपैकीं सुमारें निम्मी मिळवती व बाकी निम्मी पहिलीवर अवलंबून रहाणारी आहे. बंगाल (२४०३), ब्रह्मदेश (२२१२), आसाम (१३९६) व बिहार-ओरिसा (१०४९) या भागांतील जी मराठयांची तुरळक वसाहत आहे ती नोकरीनिमित्त झालेली आहे. याप्रमाणें हिंदुस्थानांतील महाराष्ट्रीयांची थोडक्यांत पहाणी झाली. इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, जपान वगैरे परदेशांत शिकण्यासाठीं किंवा उद्योगासाठीं जाऊन राहिलेले महाराष्ट्रीय बरेच आहेत पण ते हजारांनीं मोजण्याइतपत नाहींत आफ्रिकेंतला महाराष्ट्रीय समाज इतर परदेशी भागांतल्यापेक्षां मोठा भरेल. याची खानेसुमारी सरकारी रीतीनें जाहीर होत नसल्यानें नक्की आंकडे देतां येणें शक्य नाहीं.

साक्षरता:- साक्षरतेच्या दृष्टीनें महाराष्ट्रीय समाजाची पहाणी केल्यास बरीच निराशा होते. गुजराथेंतील साक्षर वर्गाच्या प्रमाणापेक्षां एवढेंच नव्हें तर कानडी मुलुखापेक्षांहि महाराष्ट्रांत साक्षरता कमी हें साक्षरतेच्या खानेसुमारीच्या आंकडयावरून स्पष्ट येईल. स्त्रीशिक्षणाच्या बाबतींतहि गुजराथ व कानडा हे देशविभाग हे देशविभाग महाराष्ट्राला मागें टाकितात. मुंबई, पुणें सोडल्यास महाराष्ट्रीयच काय पण सर्वसामान्य हिंदु स्त्रिया हजारांत पांचापेक्षां कमी सांपडतील. महाराष्ट्रभाषेच्या ग्रंथप्रसिध्दीवरून साक्षरता ठरवावयाची असेल तर त्या बातींतहि आपणाला हार खावी लागेल; कारण १९०१ १० या दशकांत मराठी बोलणाऱ्या एक लाख लोकवस्तीशीं मराठी पुस्तकांचें प्रमाणें सारें १५ पडतें. तर गुजराथी एक लाख लोकवस्तीशीं गुजराथी पुस्तकांचें प्रमाण ६८ पडतें. दरवर्षी मराठीपेक्षां गुजराथी पुस्तकें जास्त प्रसिद्ध होतात हें मुंबई सरकार प्रसिद्ध करीत असलेल्या 'वाङ्मयतिमाही'वरून कळेल. महाराष्ट्रीय सुशिक्षित वर्ग नोकरींत अडकला असल्यानें त्याला वाङ्मयक्षेत्रांत व इतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत धडाडीनें उडी घेऊन महाराष्ट्राला देशाचा पुढारीपणा देण्याचें कार्य करतां येत नाहीं.

व्यापारधंदा:- व्यापारधंद्यांत महाराष्ट्रीय जनता मागासलेली आहे, हें कोणालाहि कबूल करावें लागेल. व्यापाराला लागणारें भांडवल जमा होत नाहीं याचें कारण बव्हंशीं श्रीमंत लोकांच्या अदूरदृष्टींत आहे. बऱ्याच पिढया कारकुनीपेशांत राहिलेले जे महाराष्ट्रीय व्यापारांत पडण्याचें धाडस करतात, त्यांच्या अंगीं व्यापारी चढाओढीला तोंड देण्याची कुवत असत नाहीं, त्यामुळें पुष्कळसे बुडतात व त्यांची उदाहरणें पुढें व्यापारांत पडूं इच्छिणारांनां निराश करतात. बऱ्याच महाराष्ट्रीयेतर मालकांनीं चालविलेल्या कारखान्यांतून जबाबदारीच्या जागांवर महाराष्ट्रीय आहेत हें खरें पण मालक बनण्याची इच्छा त्यांच्यांत कमी दिसते. आतां सरकारी नोकरींत सुशिक्षित पांढरपेशांनां मज्जाव झाल्याकारणानें त्यांची प्रवृत्ति या क्षेत्राकडे वळत आहे. तथापि शेंकडों वर्षें अंगीं खिळलेली समाधानवृत्ति त्यांनां नडते आहे.

कला:- उच्चतम सौंदर्याभिरुचि महाराष्ट्रांत बेताबाताचीच आहे, त्यामुळें कलाकसुरींनां वाव मिळाला नाहीं. महाराष्ट्रीय सोनार, सुतार किंवा शिल्पी कोठें नावाजलेले दिसत नाहींत याचेंहि कारण हेंच. मराठयांच्या अमदानींत गुजराथी सुतार आणून राजवाडे, घरें बांधावींत हें सुप्रसिद्धच आहे. महाराष्ट्रीयांचे दागीने अगदीं साधे असतात; त्यांचीं भांडीं, कपडे किंवा रोजच्या व्यवहारांतल्या वस्तू ओबडधोबड असतात हें सांगावयास नकोच. संगीत, चित्रकला किंवा इतर ललितकला यांत महाराष्ट्रीय परावलंबी आहेत. नाटयकला मात्र जरा पुढारलेली दिसते. कलांच्या बाबतींत महाराष्ट्रीय परावलंबी आहेत. नाटयकला मात्र जरा पुढारलेली दिसते. कलांच्या बाबतींत महाराष्ट्रीय जे मागासलेले आहेत त्याचें मुख्य कारण त्यांच्या सभोंवारचा डोंगराळ राकट प्रदेश व निकृष्ट परिस्थिति हें होय.

वाङ्मय:- 'महाराष्ट्र-विभाग' पहा.

राजकारणः- मागील पन्नास वर्षांत महाराष्ट्राचें असें स्वतंत्र राजकारण असे, व रानडे, टिळक, गोखले या स्वयंप्रकाशी देशभत्तचंच्या हातीं त्याचीं सूत्रें असत. पण हे पुढारी दिवंगत झाल्यापासून महाराष्ट्राला परप्रांतीय पुढाऱ्यांच्या तंत्रानें वागावें लागत आहे व त्याच्या राजकारणाचा प्रवाह आजतरी जिवंत असा नाहीं.

सामाजिकः- सामाजिक चळवळींत महाराष्ट्र पुढारलेला दिसतो व बऱ्याच महाराष्ट्रीय सामाजिक संस्था इतर प्रांतांनां नमुन्यादाखल आहेंत यांत संशय नाहीं, पण सामाजिक बाबतींत धडाडी आढळून यत नाहीं. फाजील स्वाभिमान व संशयी दृष्टि हीं नडतात. महाराष्ट्रीय जातिसंस्था व त्यांचे धार्मिक-सामाजिक व्यवहार यांची माहिती निरनिराळया ज्ञातिनामाखालीं दिलेली आहे.

महाराष्ट्रासंबंधी अवशिष्ट माहितीकरितां एक स्वतंत्र ज्ञानकोशाचा (पुरवणी) विभाग केला आहे. प्रादेशिक माहिती महाराष्ट्रांतील प्रांत, जिल्हे, तालुके व गांवें यांखालीं सांपडेल. ऐतिहासिक माहिती त्या त्या राजघराण्यांत समाविष्ट झालेली आहे.

(संदर्भग्रंथः- बृहत्संहिता; ह्युएनसंगचीं प्रवासवर्णनें; राजवाडे-महाराष्ट्राच्या वसाहतकाल (निबंध, इति. ऐतिहासिक), राधामाधवविलासचंपु; राजारामशासत्री भागवतांचे मराठयांसंबंधी वि. विस्तारांतील लेख; वाङ्मयसूचि-प्रस्तावना, ज्ञा. को. वि. ५, प्र. १६; काळे-वऱ्हाडचा इतिहास; वैद्य-मध्य. भारत; सरदेसाई-मराठी रियासत; 'हिंदुस्थान आणि जग', ज्ञा. को. वि. १; मुंबई सेन्सस रिपोर्ट; एन्थोवेन; रसेल व हिरालाल; मुं. गँझेटिअर-दख्खनचा इतिहास, इत्यादि.)

Comments